चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक,मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार ; जुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये ७०६ गुन्ह्यांची नोंद कमी.

चंद्रपूर चे पोलीस अधीक्षक,मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसारजुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये ७०६ गुन्ह्यांची नोंद कमी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : बल्लारपूर, राजुरा व चंद्रपुरातील गोळीबार व हत्याकांडानंतर या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढल्याचे चित्र रंगविले जात असले तरी प्रत्यक्षात ही वस्तूस्थिती नाही. पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी दिलेल्या माहितीनुसार जुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये ७०६ गुन्ह्यांची नोंद कमी आहे. जुलै २०२३ मध्ये ५ हजार ३३१ गुन्हे दाखल झाले होते तर जुलै २०२४ मध्ये ४ हजार ६२५ गुन्हे दाखल झाले आहेत. गुन्ह्यांचे प्रमाण कमी व्हावे व सर्वत्र शांतता नांदावी यासाठी पोलीस पूर्ण क्षमतेने काम करीत आहे. दरम्यान पोस्कोच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली असल्याचे सुदर्शन यांनी मान्य केले.


या जिल्ह्यात जुलै महिन्यात रघुवंशी संकुल येथे मनसे कामगार सेनेचे अध्यक्ष अमन अंधेवार यांच्यावर गोळीबार झाला. त्यानंतर बल्लारपूर शहररात पेट्रोल बॉम्बची घटना झाली. तदनंतर राजुरा येथे गोळीबार करून एकाची हत्या केली गेली व ऑगस्ट महिन्यात हाजी सरवर या कुख्यात गुंडाची त्याच्याच मित्रांनी गोळीबार करून हत्या केली. गोळीबार व हत्याकांडाच्या या घटनांनी चंद्रपूर जिल्हा हादरून गेला. त्यामुळे सर्वच स्तरातून पोलीस दलावर टीका होत होती. गुन्हेगारी वाढल्याचे चित्र माध्यमांमध्ये रंगविले जात होते. परंतु ही वस्तूस्थिती नाही, असे पोलीस अधीक्षक सुदर्शन यांचे मत आहे.


गोळीबार व हत्याकांडाच्या घटना झाल्या ही वस्तूस्थिती असली तरी जुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये ७०६ गुन्हे कमी नोंद झाले आहेत. जुलै २०२३ मध्ये २० जणांच्या हत्या झाल्या होत्या तर जुलै २४ मध्ये २४ हत्या आहेत. अटेम्ट टू मर्डरच्या जुलै २०२३ मध्ये ३४ घटना होत्या तर जुलै २०२४ मध्ये ३० घटना आहे. बलात्कार, विनयभंग, पोस्को या गुन्ह्यात वाढ झाली आहे. डकैती, चोरी या घटना कमी झालेल्या आहेत. चैन स्नैचिंगची एकही घटना या वर्षभरात घडलेली नाही. चोरीच्या घटना काही प्रमाणत वाढल्या असल्या तरी आरोपींना अटक करण्याचे प्रमाण वाढले आहे. दुचाकी व चार चाकी चोरीच्या घटना कमी झाल्या आहेत. अपहरण, मारहाणीच्या घटना जुलै २०२३ च्या तुलनेत जुलै २०२४ मध्ये कमी आहेत.


फसवणूकीच्या घटनांची नोंद देखील यंदा कमी घेण्यात आलेली आहे. अपघात काही प्रमाणात वाढले असले तरी जुगार कमी झाले आहेत. रेती माफिया विरूध्द जुलै अखेर पर्यंत १६३ गुन्हे दाखल करून १८० आरोपींना अटक, २० लाख ६२ हजारांचा ऐवज जप्त केला, गुटखा, सुगंधित तंबाखु प्रकरणात ६४ गुन्ह्यात ८० आरोपींना अटक करून १ कोटी ४५ लाख ८८हजार ६०५ रूपयांचा माल जप्त केला, अवैध जनावर वाहतुक प्रकरणी ५४ गुन्ह्यात १४६ आरोपींना अटक करून १३७१ जनावरे जप्त केली व ८ कोटी ७९ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त केला तर अवैध हत्यार प्रकरणात ४२ गुन्हे दाखल करून ५१ आरोपींना अटक केली व ४४ हत्यारे जप्त केली आहेत.


पोलिस दलाने रात्रीची गस्त सुरू केली असून आगामी गणेशोत्सव व नवरात्र उत्सव बघता डायल ११२ पूर्ण क्षमतेने कार्यरत आहेत. तसेच गुन्हे कमी व्हावे व उत्सवात शांततेचे वातावरण राहावे यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना राबविण्यात येत असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सुदर्शन यांनी दिली. पोलीस गुन्हेगारांच्या विरोधात ॲक्शन मोडमध्ये आहे असेही ते म्हणाले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !