आम्ही काय फक्त काँग्रेस - राष्ट्रवादी च्या उमेदवारांची भांडीच घासायची का ? ★ ठाकरे गटाचा उल्लेख पण होत नसल्याचे पाहून सेना नेते संतापले.

आम्ही काय फक्त काँग्रेस - राष्ट्रवादी च्या उमेदवारांची भांडीच घासायची का ? 


ठाकरे गटाचा उल्लेख पण होत नसल्याचे पाहून सेना नेते संतापले.


एस.के.24 तास


वर्धा : विधानसभा निवडणुकीत यश मिळणार, असे गृहीत धरून महाविकास आघाडीचे नेते बाह्या सरसावून बोलू लागले आहे. त्यातूनच या आघाडीतील काँग्रेस,राष्ट्रवादी व सेना ठाकरे गटाचे ईच्छुक कामाला लागल्याचे चित्र आहे. वादही होवू लागले आहे.जिल्ह्यात वर्धा, देवळी, आर्वी व हिंगणघाट असे चार विधानसभा मतदारसंघ आहेत. यातूनच वाद सूरू झाले आहेत. 


आर्वी व हिंगणघाट राष्ट्रवादीकडे तर देवळी व वर्धा काँग्रेस कडे राहणार अशी उघड भाषा होत आहे. असे स्थानिक पातळीवर नेत्यांनी केलेले वाटप लोकसत्तातून उघड झाले. मित्रपक्ष असलेल्या ठाकरे गटाचा उल्लेख पण होत नसल्याचे पाहून सेना नेते संतापले. १९८७ पासून मातोश्री निष्ठावंत म्हणून राजेंद्र खुपसरे यांची ओळख दिल्या जाते. ते चार वेळा नगरसेवक तसेच एकदा बाजार समिती संचालक राहले.माजी आमदार,अशोक शिंदे यांनी मातोश्रीची साथ सोडल्यानंतर त्याचे विश्वासू राहलेले खुपसरे मात्र मातोश्री सोबतच जुळून आहेत.


ते म्हणतात महाविकास आघाडी हि तीन पक्षांची आहे, हे काही लोक विसरले असे दिसते. मात्र आम्ही विसरलो नसून विधानसभा निवडणुकीत आमचे अस्तित्व दाखवून देणार. चारही जागा हेच दोघे लढविणार असतील तर आम्ही काय यांची भांडीच घासणार, असा संतप्त सवाल खुपसरे करतात. मी मुंबईत उद्धव ठाकरे यांना भेटून आलो. त्यांना सर्व ती कल्पना दिली. त्यांनी पण वर्धा जिल्ह्यात सेना लढणार असल्याचे स्पष्ट केले. राष्ट्रवादीला खासदार दिला आता विधानसभेसाठी त्यांनी आम्हास मदत केली पाहिजे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नेते खासदार अरविंद सावंत वर्ध्यात आले असतांना त्यांनी खास हिंगणघाटच्या कार्यकर्त्यांची विशेष बैठक घेतली होती.


 असे ते आवर्जून सांगतात. तर सेना सह संपर्काप्रमुख रविकांत बालपांडे यांनी आम्हास दोन्ही काँग्रेसने गृहीत धरू नये, असा ईशारा दिला. वर्धा व हिंगणघाट आम्ही मागणार, असे ते म्हणाले. तर वर्ध्यासाठी ईच्छुक निहाल पांडे यांनी दोन जागा मागण्याचे निश्चित झाल्याचे स्पष्ट केले. महाविकास आघाडीत सर्व समान आहेत. बरोबरीने लढणार.


ठाकरे सेनेचे नेते स्पष्ट करतात की हिंगणघाट येथे आमचा स्ट्राईक रेट चांगला आहे. आम्ही सहा वेळा लढून तीन वेळा विजयी झालो. तर राष्ट्रवादी पाच वेळा लढून एकदाच विजयी झाली. चारही विधानसभा क्षेत्रापैकी हिंगणघाट येथे संघटन बांधणी चांगली आहे. जिल्हा परिषद व नगर परिषद निवडणुका लढविल्या जातात. उद्धव ठाकरे यांनी हिंगणघाट येथे अमर काळे यांच्या प्रचारार्थ सभा घेतली होती तेव्हा उपस्थित लोकांनी त्यांना कसा प्रतिसाद दिला होता, हे स्वतः खासदार काळे सांगू शकतात, असे सेना नेते मुद्दाम नमूद करतात.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !