आत्मसमर्पित नक्षलवादी," गिरीधर भगोडा ”, नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता,श्रीनिवास यांनी टीका केली आहे.

आत्मसमर्पित नक्षलवादी," गिरीधर भगोडा ”, नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता,श्रीनिवास यांनी टीका केली आहे.


काय म्हणाले होते गृहमंत्री,देवेंद्र फडणवीस ?


एस.के.24 तास

गडचिरोली : नक्षलवाद्यांच्या दंडकारण्य विशेष विभागीय समितीचा सदस्य नांगसू तुमरेटी उर्फ गिरीधर याने पत्नी संगीतासह शनिवार,23 जून ला उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री,देवेंद्र फडणवीस यांच्या समक्ष आत्मसमर्पण केले होते. यानंतर नक्षलवाद्यांच्या पश्चिम सबझोनल ब्युरोचा प्रवक्ता श्रीनिवास याने एक पत्रक जारी केले आहे. श्रीनिवासने गिरीधरला भगोडा म्हटले असून,त्याला जनता माफ करणार नाही,असा इशारा दिला आहे.


शुक्रवारी उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत गिरीधरने त्याच्या पत्नीसह आत्मसमर्पण केले.यावेळी फडणवीस यांनी गिरीधर हा गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल चळवळीतील शेवटचा नेता होता. त्याच्या आत्मसमर्पणामुळे नक्षल चळवळीचे कंबरडे मोडल्याचे म्हटले होते. यासंदर्भात नक्षल्यांचा प्रवक्ता श्रीनिवासने एक पत्रक जारी केले आहे.


श्रीनिवासने पत्रकात म्हटले आहे की, गिरीधर आणि त्याची पत्नी ४ जूनलाच माओवादी कम्युनिस्ट पक्षातून कुणालाही न सांगता पोलिसांकडे पळून गेले. गिरीधर मागील 28,तर संगीता ही 23 वर्षांपासून नक्षल चळवळीत कार्यरत होती.1996 मध्ये गिरीधर नक्षल चळवळीत सहभागी झाल्यापासून वेगवेगळ्या पदांवर जाऊन त्याने दंडकारण्यातील उच्च पद प्राप्त केले.


परंतु अलीकडे पोलिसांनी अनेक नक्षल नेत्यांना ठार केल्यानंतर माओवादी कम्युनिस्ट पक्षाला मोठ्या अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. याला समर्थपणे तोंड देण्याऐवजी गिरीधरने भयभीत होऊन पोलिसांपुढे शरणागती पत्करली, अशी टीकाही प्रवक्ता श्रीनिवास याने केली आहे.

दिवंगत नक्षल नेते पेद्दीशंकर, जोगन्ना, मल्लेश, नर्मदाक्का, सृजनक्का,विकास,भास्कर,संजय, विनू,इंदिरा,वासू यांच्या कार्याचा उल्लेख करुन श्रीनिवास याने गडचिरोली जिल्ह्याच्या नक्षल आंदोलनाच्या 44 वर्षांच्या इतिहासात चळवळ सोडून पळणारा गिरीधर हा पहिलाही नाही आणि शेवटचाही नसेल,असे म्हटले आहे.


काय म्हणाले होते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस ?

नक्षलवाद्यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून विविध योजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन नक्षलवादी चळवळीतून बाहेर पडा व मुख्य प्रवाहात या, असे आवाहन उपमुख्यमंत्री व पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी गडचिरोली पोलीस मुख्यालयात आयोजित आत्मसमर्पित नक्षली कुटुंबांचा मेळावा व संवाद कार्यक्रमात केले होते.


यावेळी जहाल माओवादी नेता गिरीधर तुमरेटी उर्फ गिरीधर व त्याची पत्नी संगीता या दाम्पत्याने आत्मसमर्पण केले होते. नक्षलवादी चळवळीच्या हिंसक कारवायांमुळे अनेकांचे आयुष्य देशोधडीला लागले. 


त्यामुळे हिंसेची वाट सोडून अनेक जण सामान्य नागरिकांप्रमाणे जीवन जगण्यासाठी आत्मसमर्पण करून योजनांचा लाभ घेत आहेत, असे फडणवीस यांनी म्हटले होते. आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून वरिष्ठ नक्षलवादी नेत्यांसह एकूण 664 माओवाद्यांनी आजपर्यंत पोलिसांसमोर आत्मसमर्पण केले आहे, हे येथे उल्लेखनीय.

शासनाच्या आत्मसमर्पण योजनेवर विश्वास ठेऊन भरकटलेले नक्षलवादी मुख्य प्रवाहात येत आहेत. यामुळे नक्षलवाद्यांमध्ये निराशा निर्माण झाली आहे. यातूनच ते अशाप्रकारे पत्रक काढून आत्मसमर्पणाच्या तयारीत असलेल्यांना धमकावत आहेत.पण ज्या कुणाला ही हिंसक चळवळ सोडून मुख्य प्रवाहात यायचे आहे. त्यांना प्रशासनाकडून सर्वोतोपरी सहकार्य करण्यात येईल. - नीलोत्पल,पोलीस अधीक्षक गडचिरोली

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !