अहेरी तालुक्यातील कमलापूर " मंगला " ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले ; हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध.

अहेरी तालुक्यातील कमलापूर " मंगला " ला नेण्यासाठी आलेल्यांना परत पाठवले ; हत्ती स्थलांतराला गावकऱ्यांचा विरोध.

 

एस.के.24 तास


अहेरी : अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे असलेले राज्यातील एकमेव शासकीय हत्तीकॅम्प पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. येथील " मंगला " नामक हत्तीनीला पेंच अभयारण्यात हलविण्यासंदर्भात आज,सकाळपासून हालचालींना वेग आला होता.परंतु गावकऱ्यांच्या विरोधानंतर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी हस्तक्षेप केल्याने हत्तीनीला नेण्यासाठी आलेल्या वाहनांना रिकामे परतावे लागले.


वनविभागातील अवजड कामे करण्यासाठी सात ते आठ दशकांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यातील आलापल्ली व सिरोंचा वन विभागात केरळहून काही हत्ती आणण्यात आले होते. तेव्हा पासून अहेरी तालुक्यातील कमलापूर येथे हे हत्ती वास्तव्यास आहे.त्यामुळे या परिसराला हत्तीकॅम्पचा दर्जा मिळाला.मात्र,मागील दोन वर्षांपासून येथील हत्तींना इतरत्र हलविण्याच्या हालचाली सुरू आहेत.यापूर्वीही पातानील येथील तीन हत्ती अंबानींच्या प्राणी संग्रहालयात हलवण्यात आले होते. सद्यस्थितीत येथे ८ हत्ती असून त्यातील मंगला हत्तीनीला पेंच अभयारण्यात नेण्यासाठी मागील काही दिवसांपासून प्रयत्न सुरू होते.


आज सकाळी मंगलाला घेऊन जाण्यासाठी मोठे वाहन परिसरात दाखल होताच गावकऱ्यांनी विरोध सुरू केला. ही बातमी जिल्ह्यात पसरताच पर्यटकांनी देखील संताप व्यक्त केला. ही बाब राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या कानावर येताच त्यांनी हत्ती हलविण्याच्या हालचालींना थांबवण्याची सूचना केली. त्यामुळे वाहनांना रिकामे परतावे लागले.


एकेकाळी नक्षल्यांच्या हिंसक कारवायांसाठी हा परिसर ओळखला जात होता. परंतु मागील दहा वर्षात हत्तीकॅम्पमुळे हा परिसर पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आला आहे. दरवर्षी राज्यभरातून हजारो पर्यटक येथे भेट देतात. त्यामुळे जिल्ह्यासह राज्यभरातील नागरिकांना या हत्तीकॅम्पबद्दल विशेष आकर्षण आहे. यासंदर्भात वनविभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही.


यापूर्वी ही झाला प्रयत्न : - 

राज्यातील एकमेव शासकीय हत्ती कॅम्प म्हणून गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा वनविभाग अंतर्गत येत असलेल्या कमलापूर हत्तीकॅम्पची ओळख आहे. या ठिकाणी अजित, मंगला, बसंती, रूपा, राणी, प्रियंका,गणेश, लक्ष्मी असे आठ हत्ती आहेत. यापूर्वी येथील हत्तींना गुजरातमधील जामनगर येथे अंबानींच्या ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या प्राणी संग्रहालयात हलविणार होते. मात्र, स्थानिकांचा आणि वन्य प्रेमींचा मोठा विरोध झाल्याने केवळ आलापल्ली जवळील ‘पातानील’ येथील तीन हत्तींना नेण्यात आले. आता पुन्हा तोच प्रयत्न होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये रोष आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !