सुनेला वाचविण्यासाठी सासूने हात दिला अन् दोघी ही बुडाले.
गणपूर नाव (डोंगा) दुर्घटनेमुळे गडचिरोली जिल्ह्यात हळहळ.
विशाल बांबोळे - कार्यकारी संपादक
चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील गणपूर (रै) जवळील वैनगंगा नदीपात्रात नाव उलटून सहा महिलांना जलसमाधी मिळाली.मोलमजुरी करून कसेबसे आयुष्य जगणाऱ्या गावातील सहा महिलांवर एकाच दिवशी काळाने झडप घातल्याने जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. यात नाव उलटल्यानंतर खडकाचा आधार घेत बचावलेल्या सासूने डोळ्यापुढे बुडणाऱ्या सुनेला हात दिला आणि दोघीही बुडाल्या.
गडचिरोली आणि चंद्रपूर जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या गणपूर (रै) गावातील महिला मजूर चंद्रपूर जिल्ह्यातील टोक या गावी मिरची तोडण्यासाठी जातात. मंगळवारीदेखील या महिला नेहमीप्रमाणे वैनगंगा नदीपात्रातून दोन नावेने निघाल्या होत्या. परंतु आदल्या रात्री चिचडोह प्रकल्पातून कोणतीही पूर्वसूचना न देता पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने नदीपात्रात पाण्याचा प्रवाह वाढला होता.यापासून अनभिज्ञ असलेल्या नावाड्याला अंदाज न आल्याने नाव नदीच्या मधोमध गेल्यावर उलटली.
दोन नावेतील एकूण सोळा महिला बुडाल्या. यातील एक नाव ज्या ठिकाणी बुडाली त्याठिकाणी खडक जवळ असल्याने त्यातील आठ जण बचावले.परंतु दुसऱ्या नावेतील आठपैकी दोघे बचावले.
जिजाबाई दादाजी राऊत वय,५५ वर्ष पुष्पा मुक्तेश्वर झाडे वय,४२ वर्ष रेवंता हरिश्चंद्र झाडे वय,४२वर्ष मायाबाई अशोक राऊत वय,४५ वर्ष सुषमा सचिन राऊत वय,२५ वर्ष बुधाबाई देवाजी राऊत वय,६५ वर्ष
सर्व रा.गणपूर(रै.) या सहा महिला बुडाल्या.यातील दोघींचे मृतदेह आढळून आले.इतरांचा शोध सुरू आहे.यात बुडालेल्या मायाबाई राऊत नाव उलटताच खडकाचा आधार घेत बचावल्या होत्या.परंतु डोळ्यापुढे सून सुषमा राऊत बुडत असताना मायाबाईने तिला वाचवण्यासाठी हात पुढे केला.पण प्रवाह अधिक असल्याने मायबाई देखील सुने सोबत वाहून गेल्या.
जलसमाधी मिळालेल्या महिलांमधील पाच महिला पहिल्यांदाच मजुरीसाठी निघाल्या होत्या आणि घात झाला. असे गावकऱ्यांनी सांगितले. या घटनेमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे.
चिचडोह प्रशासन विरोधात संताप : -
दुर्घटने नंतर पोलिस कडून शोध मोहीम राबविल्या जात आहे.दरम्यान,नदी पात्रात प्रत्यक्ष जाऊन गावकऱ्यांशी संवाद साधला असता त्यांनी चिचडोह प्रकल्पातून कुठलीही पूर्वसूचना न देता पाणी सोडण्यात आल्याचे सांगितले.
यामुळे रात्रभरात पाण्याचा प्रवाह वाढला.त्यामुळे नाविकाला पाण्याचा अंदाज आला नाही.अशाप्रकारे पाणी सोडताना धरण प्रशासनाकडून पूर्वसूचना देण्यात येते. परंतु मंगळवारी तसे घडले नाही आणि घात झाला. याला दोषी चिचडोह प्रकल्पातील अधिकारी असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांनी केली आहे.