जिल्हातील प्रस्थावित ६५ रेतीघाट करणार तस्करांना लाल ?
रोखठोक : - प्रा.महेश पानसे.विदर्भ विभागीय अध्यक्ष.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र प्रदूषण नियत्रण मंडळ,उप प्रादेशिक अधिकारी चंद्रपूर यांचे १२ डिसे.२०२३ चे जिल्ह्यातील ६५ रेती घाटांच्या पर्यावरण विषयक जनसुनावणीचे पत्र वाचून हसावे की रडावे असा प्रश्न पर्यावरण प्रेमी जागरूक नागरिकांना पडल्यास नवलं वाटण्याचे कारण नाही.आज पावतो रेती तस्करांनी पार ओरबाडून चिरहरण केलेल्या जिल्यातील ६५ रेती घाटांचा लिलाव जिल्हा खनिकर्म अधिकाऱ्याने प्रस्तावित केल्यानंतर हा प्रकार लग्न जुळल्यावर मुलगा पसंत करण्याचा म्हणावा लागेल.याला काही अर्थ उरत नाही व यात पडायला ग्रामीण जनतेची मती मारल्या गेलेली ही नसल्याचे बोलल्या जाते.
जनसुनावणीत काय होणार याचे कुतूहल कुणाला असो वा नसो मात्र लवकरच चोरीचा मामला सुर होण्याच्या खुशीने रेती तस्करांच्या चेहऱ्यावर लाली चढली असल्याची चर्चा जोरात आहे.रेती घाटांचा लिलाव किंवा रेती तस्कर,संबधित विभागाने राष्ट्रीय संपत्ती चे केलेले हनन व यातून वारंवार झालेले पर्यावरणाचे चिरहरण साऱ्या जनतेनी उघड्या डोळ्यांनी बघितले आहे.गत अनेक सालापासून या भयानक नैसगिंक बे-इभ्रतीबद्दल् सारी जनता आकांडतांडव करीत असताना रेती उत्खननाचे नियम संबधितांनी पाळले नाहीत.
जिल्हा खनिकर्म विभागाने बेधूम झालेले उत्खनन कधीमोजले नाही,महसूल विभागाने तस्करांना दिलेल्या वाहतुक परवाण्याची कधी खातरजमा केली नाही, घाट दिवस रात्र जेसिबी लावून खोदल्या गेले याची गंभीरतेने दखल घेतल्या गेली नाही.
ही जनतेची ओरड कायम असताना प्रदूषण नियंत्रण मंडळाची १३ जाने.२०२४ ला आयोजित करण्यात आलेली आता जिल्ह्यतील ६५ घाटांची पर्यावरण विषयक जनसुनावणी ? जिल्ह्यातील ६५ ग्रा.प.व या गावातील जनता किती आपुलकीने आता कोणते सवाल व कुठल्या विश्वासाने उपस्थीत करावेत याचे सर्व विभागानी चिंतन करायला हवे हेच सारे बोलताना दिसतात.
जिल्हा खनिकर्म विभागाने जिल्ह्यातील ६५ रेतीघाट प्रस्तावित केलेले आहे. त्यात गोंडपिपरी तालुक्यातील ५,पोंभुर्णा ५, ब्रह्मापुरी १५,चंद्रपूर तालुका ३,मूल तालुक्यातील ९,सावली ५,वरोरा ३,सिंदेवाही ६,भद्रावती ४,कोरपना ४,चिमूर २,बल्लारपूर तालुका १ असा समावेश आहे.
मूल,सिंदेवाही व ब्रम्हपुरी तील रेती फार प्रसिद्ध असून या घाटात रेती तस्करीचा अक्षरशा धुमाकुळ असल्याची कायम ओरड राहिली आहे.शासन निर्धारीत दरापेक्षा कितीतरी अधिक पटीने कोटयावधीत या घाटांचा लिलाव गत साली झालेला आहे.गतवर्षी रेती उपसा थांबल्या नंतरही लाखो ब्रास माल आधीच स्टॉक करण्यात आला होता.हे विशेष.
नंतर जिल्हा खनिकर्म अधिकारी यांनी विशेष आदेश काढून हा साठा विक्रीची परवानगी दिली होती .मोठी ओरड झाली पण पाणी कुठे मुरले हे मात्र स्पष्ट झालेच नाही.प्रशासनास पर्यावरणा ची खरंच चिंता असेल तर क्षेत्राबाहेर व खाली निर्धारीत खोलीचे आत रेती उपसा होऊ नये.रात्रौ व जेसिबीद्धारे उपसा करण्यात येऊ नये. दिलेले वाहतुक परवाने तपासणी पथक नेमण्यात यावा.
यात हेराफेरी आढळल्यास राष्ट्रीय संपत्तीचे हनन याखाली फौजदारी गुन्हे दाखल करायला हवेत. जिल्हयाबाहेर जाणाऱ्या मालावर अधिक कर लावावा अशी मागणी घाट तिरावरील गावकऱ्यांची असल्याचे कळते. रेतीघाटांचा कितीतरी पटीने उपसा होत असल्याने राष्ट्रीय हानी तर न भरणारी आहेच सोबत भूगर्भामधे रेती अभावी चाळणी न होता अशुद्ध पाण्याचा थर साठून आरोग्यास मोठा अपाय होत असल्याचे जाणकार बोलताना दिसतात.