बालरोग चिकित्सा विभागात साहित्य खरेदीत लाखोंची उधळपट्टी. ★ वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण चौकशीची मागणी.

बालरोग चिकित्सा विभागात साहित्य खरेदीत लाखोंची उधळपट्टी.


★ वैद्यकीय महाविद्यालयातील प्रकरण चौकशीची मागणी.


एस.के.24 तास


चंद्रपूर : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा सामान्य रुग्णालयातील बालरोग चिकित्साशास्त्र विभागात ईसीआरपी- २ या योजनेअंतर्गत कोट्यवधींचे साहित्य खरेदी व विविध कामे करण्यात आली. मात्र, या कामात मोठ्या प्रमाणात अनियमितता व लाखो रुपयांची उधळपट्टी करण्यात आल्याचे समोर आले आहे. खरेदी केलेल्या साहित्याचे दर दीड ते दोन पट वाढवून खरेदी केली आहे.


शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला ईसीआरपी-२ या योजनेअंतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधी शासनाकडून दिला जातो. या योजनेच्या माध्यमातून विविध कामे व यंत्रसामुग्री खरेदी केली जाते. मात्र, या याेजनेअंतर्गत शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात खरेदी केलेली साधनसामुग्री बाजारभावापेक्षा अधिक दराने खरेदी करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.


२०२१-२२ मध्ये या योजनेअंतर्गत २ कोटी ६५ लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला. या निधीतून आवश्यक ती साधनसामुग्री खरेदी केली. मात्र, यामध्ये पीसीयू ४२, ४२ आयव्ही स्टॅड हे खरेदी न करता वॉर्ड क्रमांक १६ मधील बालरोग चिकित्साशास्त्र विभागातील टाकण्यात आले आहे. तसेच २०२२-२३ मध्ये याच योजनेतून १ कोटी ४९ रुपयांचा निधी प्राप्त झाला.


या निधीतून पीसीयू ३० खाटा, विविध यंत्रसामुग्री, वातानुकूलित यंत्र १२, छोटे मोठे बांधकाम केले गेले. मात्र, या खरेदी केलेल्या सानधसामुग्रीचे दर बाजारमूल्यापेक्षा दीड ते दोन पट अधिक दराने खरेदी करण्यात आले आहे. आयएफबी कंपनीचा दोन टनाचा इनव्हर्टर वातानुकूलित यंत्र बाजार भावानुसार ४७ हजार रुपयांचा आहे. मात्र, तेच वातानुकूलित यंत्र अधिक दर देऊन १ लाख १९ हजार रुपयांना खरेदी करण्यात आला आहे.


यामध्ये तब्बल एका वातानुकूलित यंत्रामागे ७० हजार रुपयांची उधळपट्टी केल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. ही सर्व कामे बालरोग चिकित्साशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मिलिंद कांबळे यांच्या अधिकारात झाली आहे. दरम्यान, या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा करून माहिती अधिकारात माहिती मागितली गेली. परंतु माहिती देण्यास टाळाटाळ केली गेली. मात्र शेवटी माहिती मिळवून आरोग्य विभागाकडे या प्रकरणाची तक्रार केली आहे.


या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी थॅलेसेमिया बहुउद्देशीय कल्याणकारी संस्थेचे अध्यक्ष सुरेश आत्राम यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आरोग्य मंत्री तानाजी सावंत,पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, विरोधी पक्षनेते,विजय वडेट्टीवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !