चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री विसरले दिलेले आश्वासन.
★ कुरमार समाजाचे कुटुंब घरकुल योजने पासून वंचित.
★ कुरमार/धनगर समाजातील कार्यकर्त्यांचा आरोप.
सुरेश कन्नमवार - मुख्य संपादक
मुल : महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेअंतर्गत चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भटक्या जमाती करिता मोठ्या प्रमाणात घरकुल मंजूर झाले परंतु भटक्या जमातीमध्ये येणाऱ्या कुरमार,धनगर जातीला एकही घरकुल न देता वंचित ठेवल्याने निवडणुकीपूर्वी मूल येथील मेंढपाळ परिषदेत दिलेले घरकुलाचे आश्वासन विसरल्याचा आरोप कुरमार समाजाचे कार्यकर्ते,शुक्राचार्य मद्रीवार,रामू कोरीवार,मुकरू कोमावार यांनी केला आहे.
यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत घरकुल योजना ही रमाई आवास योजना, शबरी आवास योजना या धर्तीवर भटक्या जमातीसाठी आहे. चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नाने भटक्या जाती जमाती, इतर मागास बहुजन विकास विभागाच्या वतीने 8 फरवरी 2023 शासकीय परिपत्रकानुसार चंद्रपूर जिल्ह्यातील 2803 भटक्या जमातीतील कुटुंबाना घरकुल मंजूर झाले आहे.त्यात बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मुल तालुक्यात 1904 घरकुलांना मंजुरी देण्यात आली.
असून निधीही समाजकल्याण विभागाला देण्यात आली आहे.मात्र घरकुल मंजूर करीत असतांना भटक्या जमातीत येत असणाऱ्या धनगर,कुरमार समाजाला एकही घरकुल न देता डावलले आहे. आजही कुरमार समाजाचे अनेक कुटुंब भटकंती करीत शेळ्या मेंढ्यासह उदरनिर्वाह करतात.
हा समाज बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातील मूल तालुक्यात जुनासुर्ला,बेंबाळ,नांदगाव ,गडीसुर्ला, चांदापूर,मूल या गावात फार मोठ्या संख्येत आहे.या समाजातील मतदारांची मते मिळावी याकरिता या क्षेत्राचे नेतृत्व करणारे विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी विधासभा निवडणुकीच्या समोर मूल येथे मेंढपाळ परिषद घेऊन घरकुलाचे स्वप्न दाखविले.मात्र घरकुल देतांना कुरमार समाजाला डावलल्याचा आरोप पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांचेवर कुरमार समाजाचे कार्यकर्ते,शुक्राचार्य मद्रीवार,रामू कोरीवार,मुकरू कोमावार यांनी केला आहे.