शाई फेकणाऱ्या 'त्या' सैनिकाचे समर्थन करीत दिले एक लाखाचे बक्षीस.
★ भव्य धम्म संमेलनात राजरत्न आंबेडकर यांची घोषणा.
नरेंद्र मेश्राम : एस.के.24 तास
भंडारा : सूर्य प्रकाशमय असून कोणीही सूर्यावर थुंकायचा प्रयत्न केला तर तिथून की त्याच्या तोंडावर परत येते ती थुंकी काळ्या शाईच्या रूपात चंद्रकांत पाटलांच्या तोंडावर पडली असल्याचे सांगत शाई फेकणाऱ्या 'त्या' समता सैनिक दलाच्या सैनिकाचे समर्थन करून त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस देण्याचे आवाहन राजरत्न आंबेडकर यांनी केले. वास्तविक पाहता ते काम आम्हालाच करायचे होते मात्र ती संधी मिळाली नाही. ही संधी त्या समता सैनिक दलाच्या सैनिकाला मिळताच त्याने संधीचे सोने केले. मी आंबेडकर कुटुंबीयांच्या वतीने त्याचे आभारी आहे असेही ते म्हणाले. ते १२ डिसेंबर रोजी लाखांदूर येथे आयोजीत भव्य धम्म संमेलनाप्रसंगी बोलत होते.
संमेलनाचे अध्यक्ष म्हणून दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष,राजरत्न आंबेडकर उपस्थित होते. या संमेलनाला विशेष अतिथी म्हणून दिल्ली येथील माजी सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम तर प्रमुख मार्गदर्शक म्हणून नागपूर येथील ओबीसी धम्मदीक्षा समिती अध्यक्ष डॉ.रमेश राठोड,प्रमुख अतिथी म्हणून आवाज इंडिया टिव्हीचे संचालक अमन कांबळे, पत्रकार प्रशांत कानोजिया,शशिकांत जाधव, दिनेश हनुमंते,विजय बंसोड,रोहिदास राऊत, इंजी.रुपचंद रामटेके,प्रा.युवराज खोब्रागडे,महेंद्र बारसागडे यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
ते पुढे म्हणाले, बौद्ध होण्यापूर्वी समाज जातीत विभागला होता. प्रत्येकजन जातीनिहाय कामे करीत होता. त्यावेळी प्रत्येक स्त्रीला वाटायचे की तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला ते पारंपारिक काम करण्याची संधी मिळावी मात्र बाबासाहेबांनी बौद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर नागरिकांनी पारंपारिक कामे बाजूला सारले. आज समाजातील प्रत्येक स्त्रीला तिच्या गर्भात वाढणाऱ्या बाळाला उच्च पदावर पाहण्याचे स्वप्न पडत असल्याचे ते म्हणाले.
६६ वर्षांपूर्वी बौद्ध समाजातील नागरिकांच्या छातीला गाडगे आणि पाठीला झाडू होता मात्र आज त्या समाजाची प्रगती झाली असून त्या समाजावर संशोधन करता येईल असा हा समाज आहे. आज या समाजातील व्यक्ती राष्ट्रपती पदापर्यंत पोहोचू शकतो आणि ही किमया केवळ बाबासाहेबांमुळेच झाल्याचे ही ते बोलले.
या जिल्ह्यातील ४ हजार बौद्ध बांधव एकत्र आलेत तर मी तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची बँक देतोय आणि सोबतच शासनाकडून १०० रुपये कोटींचे अनुदानही मिळवून देतोय आणि हे सर्व बाबासाहेबांनी करून ठेवल्याचे राजरत्न आंबेडकर यांनी ठणकावून सांगितले. या पैशावर आपण आपल्या समाजातील विद्यार्थ्यांना डॉक्टर, इंजिनियर, वकील यासह अन्य उच्चपदस्थ नागरिक तयार करण्यासाठी प्रयत्न करू असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाचे प्रास्तविक इंजी महेंद्र बारसागडे यांनी केले तर संचलन व आभार मनोज बंसोड व यांनी मानले.
उपस्थित समाज बांधवांसोबत पठण केल्या २२ प्रतिज्ञा. : -
दिल्लीचे सामाजिक न्याय मंत्री राजेंद्र पाल गौतम यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून मुख्यमंत्री केजरीवाल यांनी त्यांचे मंत्रिपद काढून घेतले. त्यानंतर त्यांनी मंत्रीपदाचा त्याग करून आज धम्माचे काम करायला लागले आहेत. या २२ प्रतिज्ञा देशभर घुमल्या पाहिजेत असे सांगत उपस्थित समाज बांधवांसमोर बाबासाहेबांनी दिलेल्या २२ प्रतिज्ञा पठण केल्या.
देशाच्या प्रधानमंत्र्याचा राजीनामा का मागत नाहीत.?
राजेंद्र पाल गौतम यांनी बौद्ध धम्माची दीक्षा घेतली म्हणून दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा मागितला मग या देशाचे प्रधानमंत्री नियमित मंदिरात घंटा बडावत असल्याचा आरोप करीत त्यांचा राजीनामा का मागत नाहीत ? असा खोचक सवालही केला.
रॅलीतून दिला एकतेचा संदेश : -
धम्म संमेलनाच्या दिवशी सकाळी १० वाजताच्या सुमारास तालुक्यातील हजारो बौद्ध बांधवांनी संपूर्ण लाखांदूर शहरातून रॅली काढून एकतेचा संदेश दिला. ही रॅली जवळपास दीड ते २ किलोमीटर एवढी लांब होती. या रॅलीतून 'जय भीम' चा नारा देण्यात आला. या रॅलीमध्ये समता सैनिक दलाच्या पदाधिकाऱ्यांनी विशेष सहकार्य केले. या रॅलीच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर, रमाबाई, क्रांतीबा ज्योतिबा फुले,शिक्षणाच्या आराध्य दैवत सावित्रीबाई फुले यांची वेशभूषा केलेल्या चिमुकल्यांनी लाखांदूर वासियांचे लक्ष वेधून घेतले होते.