पुराच्या पाण्याखाली आलेली शेती
मदत नको कायमची उपाय योजना हवी.
विवेक खरवडे!विशेष प्रतिनिधी!एस.के.24 तास
सावली : पूर्व विदर्भातील 'महापूर' या अस्मानी संकटाने भयभीत झालेल्या नागरिकांच्या मदतीसाठी अनेक मंत्री,नेत्यांचे दौरे झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री,देवेंद्र फडणवीस,विरोधी पक्षनेते अजित पवार,काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्यासहित अनेकांनी या पूरग्रस्त भागात दौरा करून, मदतीच्या घोषणा केल्या. तरी यावर कधीच कुणाचे समाधन होत नसते; कारण अनेकदा नुकसान होते लाखांचे आणि मदत मिळते हजारांत. अशा तोकड्या मदतीने तात्पुरती मलमट्टी होत असली,तरी जखम भरून येत नाही.यामुळे आता महापुराची नक्की कारणे कोणती आणि त्यांच्यावर कायमस्वरूपी उपाययोजना काय करता येईल, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
वैनगंगा नदीला पूर आल्याने महामार्ग बंद..
भविष्यात असे महापूर पूर्णपणे रोखणे शक्य नसले, तरी कमीत कमी नुकसान कसे होईल, यासाठी उपाययोजना करणे आपल्या हातात आहे. यासाठी नदीपात्रातील अतिक्रमणे रोखणे, आहेत ती अतिक्रमणे काढून टाकणे; नदी, ओढे आणि नाल्यांच्या पात्रातील गाळ काढणे,शेतकऱ्यांनी अरुंद केलेली नद्यांची पात्रे पुन्हा रुंद करणे आवश्यक आहे.
![]() |
पूर्णपणे पाण्याखाली आलेली शेती |
याशिवाय, रस्त्याच्या निमित्ताने जागोजागी भराव टाकून जे कृत्रिम बंधारे बांधले आहेत,ते काढून तेथे मोरी टाइप पूल बांधणे आवश्यक आहे. नदीला भिंत बांधण्याच्या अव्यवहार्य कल्पनेऐवजी, इतर अनेक कायमस्वरूपी उपायांची भिंत बांधावी लागेल. सध्या पूरग्रस्तांसाठी नाना प्रकारच्या मदतीचा महापूर येणेही आवश्यक आहे. संकटाशी एकाकी लढणाऱ्या पूरग्रस्तांना त्यामुळे थोडा दिलासा मिळेल. तत्कालीन कामचलाऊ उपाययोजनां ऐवजी दीर्घकालीन; परंतु कायमस्वरूपी ठरणाऱ्या उपाययोजना आखणे आणि त्या त्वरेने कार्यान्वित करणे, हा महत्त्वाचा मार्ग आहे.