आदीवासी समुदायातून असंख्य एकलव्य चमकावे : प्रशांत चव्हाण
एस.के.24 तास
चिमुर : शासकीय आकडेवारीनुसार राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरील नामाकिंत शैक्षणिक संस्थांमधील उच्चशिक्षणासाठी आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व अत्यंत कमी आहे. त्यामुळे शिक्षण क्षेत्रामध्ये असमानतेची मोठी दरी निर्माण झालेली आहे. या दरीला नष्ट करण्यासाठी पूर्व विदर्भातील आदिवासी समुदायातील विद्यार्थ्यांनी योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण घ्यावे आणि या विभागातून असंख्य एकलव्य चमकावे, असे प्रतिपादन एकलव्य इंडिया फाऊंडेशनचे सहसंस्थापक प्रशांत चव्हाण यांनी केले. दिनांक 12 जून 2022 रोजी ब्राईटएज फाउंडेशन आणि नेचर फाउंडेशनच्या वतीने आयोजित एक दिवसीय कार्यशाळेत ते बोलत होते.
नुकताच बारावीचा निकाल लागलेला आहे. यात उत्तीर्ण झालेल्यांना योग्य मार्गदर्शन व प्रशिक्षण मिळावे या दृष्टिकोनातून एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेमध्ये बारावीनंतर असलेल्या विविध संधी या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. सोबतच प्रशांत चव्हाण यांनी पारंपरिक चौकटी पलीकडे असलेले शिक्षण व करियरचे विविध पर्याय, देश- विदेशातील प्रतिष्ठीत महाविद्यालय व विद्यापीठांमध्ये प्रवेश प्रक्रिया व प्रतिष्ठित विद्यापीठांमधील उच्च शिक्षण व करिअरसाठी लागणारे पायाभूत कौशल्य या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यानंतर पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना सुद्धा वरील विषयावर मार्गदर्शन करण्यात आले.
मार्गदर्शन करत असताना त्यांनी देशातील आयआयटी, आयआयएम, दिल्ली विद्यापीठ , जवाहरलाल नेहरु विद्यापीठ, अजीम प्रेमजी विद्यापीठ,टाटा सामाजिक विज्ञान केंद्र मुंबई यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रतीनिधित्वा विषयी चर्चा करून इत्यंभूत माहिती दिली. आदिवासी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची गरज याविषयी सखोल मार्गदर्शन केले. उच्च शिक्षण घेण्यासाठी उपयुक्त असलेल्या विविध विद्यापीठ व शैक्षणिक संस्थांची माहिती त्यांनी विद्यार्थ्यांना दिली. सोबतच या नामांकित शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेण्याची प्रक्रिया याविषयी सखोल मार्गदर्शन केले.
तसेच प्रवेश घेण्यासाठी पुरेपूर मदत करण्याची जबाबदारी सुद्धा त्यांनी घेतली. यादरम्यान त्यांनी जास्तीत जास्त आदिवासी विद्यार्थ्यांना "सार्वजनिक धोरण" या विषयात उच्च शिक्षण घेण्याची खूपच गरज आहे, असे मत व्यक्त केले. या कार्यशाळेला 12 वी व पदवीच्या एकूण 90 विद्यार्थ्यांनी यात सहभाग नोंदवला होता.