उमेश सहारे यांच्या लेखणीतून... अंधश्रद्धेची न जाणारी लाट ; गावातील वैद्य, बुवा संपत चालले मात्र अंधश्रद्धेची लाट काही केल्या जाईना...!

उमेश सहारे यांच्या लेखणीतून...


अंधश्रद्धेची न जाणारी लाट ; गावातील वैद्य, बुवा संपत चालले मात्र अंधश्रद्धेची लाट काही केल्या जाईना...!

नमस्कार मी,                                                                   उमेश सहारे...       

     

मी अखील भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समिती,शाखा गडचिरोली यासंघटनेशी जुळून असल्याने काही गंभीर बाबी आज आपल्या समोर मांडाव्यास्या वाटल्या म्हणुन छोटासा लेख लिहीण्याचा प्रयत्न केला आहे, 

नक्की वाचा...


सध्यस्थितीत कोरोना विषाणू  बाबत ग्रामीण भागात अंधश्रद्धेची लाट आलेली आहे. इतर गावांप्रमाणे माझ्या गावामध्ये सुद्धा गोवर व कोरोना या आजारांचा गावात शिरकाव होवू नये म्हणुन ५ मंगळवार दिवस पाळन्याचे ठरले,म्हणजे काय तर या दिवशी कोणत्याही व्यक्तिला गावाबाहेर जाता येणार नाही, तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करणारे मांसाहार करता येणार नाही असेही गावातील काही पुढारींनी लोकसहमतातून ठरविले व त्याची अंमलबजावणी देखील सुरु झाली आहे.शुद्ध अंधश्रद्धेचा हा प्रकार असून याचा विज्ञान व सद्सद्विवेक बुद्धिशी काही एक संबंध नाही. 


गावातल्या मोठ्यांचा-गुरूजनांचा मान राखायचा म्हणुन व गावात भांडण नकोत म्हणुन काही सुशिक्षित तरूणांनी याला विरोध दर्शविला नाही असो..! 


पहील्या मंगळवारला सुरू झाली, वैनगंगा नदीचे वाहते पाणी आणुन माऊली ला चढवायचे असे ठरले व सकाळ पासुनच या प्रक्रियेला सुरूवात झाली, दुपारचे  १२ वाजले मातापुजनाची तयारी सुरू झाली. 


 जसा डपरा वाजवीला तसा अंगात देव आणणाऱ्या बायांनी जो गावात धिंगाणा केला तो मात्र अशोभनीय व लज्जास्पद होता,विज्ञानाला लाजवेल असे त्या महिलांचे वर्तन होते, आणि गावातील सर्व लोक एकत्रित आल्यामुळे सोशल डिस्टंट्सींग ची तर ऐसीतैसी झालीच झाली. तेव्हा कोरोना ला घालवताय कि बोलावताय हा प्रश्न माझ्याही मनात आला होता.


खरं तर अंगात देव-देवी येणे हा नुसताच खोटारडापणा, फसवणूक, गैरकानूनी व पझेशन सिंड्रोम या आजाराचा प्रकार आहे असे अभाअंनिस नेहमी समाजजागृती च्या माध्यमातून विशेषत: ग्रामीण भागातील लोकांना संदेश देत असते परंतु याचा परिणाम कितपत लोकांवर होत आहे हे आपणच ठरवूया. ग्रामीण भागातील प्रत्येक गावांत अशा महीला व पुरुष देखील आढळून येतात तसे माझ्याही गावात 7-8 महीला आहेतच; यात एकीला पाहून एक महीला एडमिशन घेत आहेत व पुन्हा भविष्यात ही संख्या वाढणार आहे हे नक्की. अंगात देव येणाऱ्या महिलांचे दोन गट असतात, पहीला गट- ज्यांना पैसा, संपत्ति, धान्य, भौतीक गरजा पाहीजे असते व दुसरा गट- ज्यांना पद, प्रतिष्ठा, सन्मान, इतर महिलांपेक्षा वेगळा सन्मान मग तो एका दिवसासाठी का असेना पण ते पाहीजे असते. माझ्या गावात ज्या महीला आहेत त्या दुसऱ्या गटातील आहेत पण सुरूवात दुसऱ्या गटातून होवून मग हळूहळू पहिल्या गटात प्रवेश करतील हे देखील नाकारता येत नाही.


अंगात देव येण्याच्या घटना अशिक्षित, समाजविरहित राहणाऱ्या स्त्रिया किंवा पुरुष यांच्याबाबतीत जास्त प्रमाणात घडतात. या व्यक्ती सतत एकच विचार करीत असतात यामुळे भावनिक व अंधश्रद्धाळू विचार त्यांच्या मनात येत असतात. पारंपरिक मते, जुने संस्कार, व पुर्वजांच्या विचारांचा पगडा याला कारणीभूत आहे. ज्या व्यक्तींच्या/बायकांच्या अंगात देव येतो त्यांना काही वेळा भ्रमिष्ट होते किंवा बेताल होते, याला मनोरुग्ण अवस्था म्हणतात आणि याचेच रुपांतर न्युराॅसिस सारख्या आजारमध्ये होते. ढोलक, बॅंड,डपरा, इ. वाद्य वाजले की यांच्या अंगात देव येतो आणि बंद झाला की तो आपोआप जातो, काही महिला काहीतरी विचीत्र मुद्दामुन बडबड करतात व आपण दैवी भाषा बोलत असल्याचे सुचवितात, तसेच अनेकदा अंगात आलेल्या व्यक्तींची ओटी भरली, प्रसाद दिला किंवा कुंकू लावला तर ते नॉर्मल होतात व अंगातला देव निघून जातो हा सर्व प्रकार त्यांच्या मानसिक भ्रमामुळे घडतो. 


अंगात देव आलेली व्यक्ती हव्या असणाऱ्या वस्तू किंवा इतर गोष्टींची जी मागणी करेल ती गावातील किंवा घरातील लोकांकडून पुरविली जाते व यातून देव आलेली व्यक्ति नकळतपणे मनातील आपली इच्छा पूर्ण करून घेते. हा प्रकार ग्रामीण भागात बुवाबाजीच्या व भोंदुबाबांच्या आहारी गेलेल्यांमध्ये जास्त बघायला मिळतो. अशा घाणेरड्या व अंधश्रद्धांच्या प्रकारांमुळे नेहमी गावांचे नुकसानच झाले आहे हे आपण वर्तमानपत्रातून नेहमी वाचत असतो. यातूनच नरबळी, हत्या, आत्महत्या, महीलांचा विनयभंग इ. प्रकरणे जन्मास येत आहेत. हे सर्व नाटक बंद करता येवू शकते; त्यासाठी एक तर प्रत्येक व्यक्तिने आपल्या घरातील लोकांमध्ये जागृती केली तर आणि दुसरे म्हणजे गावातल्या किमान ५०% लोकांनी एकत्रित येवून यावर आळा बसवायचे असे ठरविले तरचं. जर हे प्रकार बंद झाले नाही तर एक ना एक दिवस हेच प्रकार गावांच्या अंगाशी आल्याशिवाय राहणार नाही हे मात्र तेवढेच खरे. कोरोनाच्या अनेक लाटा येवून जातीलही परंतु कित्येक वर्षांपासुन आलेली ही अंधश्रद्धेची लाट केव्हा व कशी जाणार हा द्विधामनस्थितीत टाकणारा प्रश्न आहे असे मला वाटते.


 लेखक / कवी : -  उमेश एच.सहारे               मु.राजोली,ता.सावली,जि.चंद्रपुर                             मो.नं : - 9307569097

Tags

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !