पुलाच्या सुरुवातीला संरक्षण कठडे नसल्याने अपघातांचा धोका वाढला.
पालांदूर-दिघोरी राज्यमार्गावरील खराशी पुलाजवळील प्रकार.
पुलाच्या सुरुवातीला संरक्षण कठडे लावण्याची मागणी.
नरेंद्र मेश्राम
जिल्हा प्रतिनिधी - भंडारा
भंडारा : लाखनी तालुक्याच्या शेवटच्या टोकावर असलेल्या
पालांदूर-दिघोरी राज्यमार्ग क्रमांक 358 वरील खराशी गावाजवळच्या नाल्यावरील पुलाच्या सुरुवातीलाच संरक्षण कठडे नसल्याने रात्री-अपरात्री पुलाजवळ गंभीर अपघाताची शक्यता लक्षात घेता पुलाच्या दोन्ही बाजूस सुरुवातीला संरक्षण कठडे उभारण्याची मागणी या भागातील नागरिकांकडून केली जात आहे.
सार्वजनिक बांधकाम लाखांदूर उपविभागा अंतर्गत येणाऱ्या राज्यमार्ग क्रमांक 358 वरील खराशी गावाजवळील या पुलाच्या सुरुवातीलाच संरक्षण कठडे नसल्याने व त्यातल्या त्यात पुलाच्या सुरुवातीलाच दोन्ही बाजुला भराव दबल्यामुळे बराच मोठा खड्डासदृश गचका पडल्याने हा पूल प्रवास करणाऱ्या वाहनधारकांकरिता धोकादायक ठरू पाहत आहे.
याकडे संबंधित विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे या ठिकाणी कित्येक किरकोळ अपघातही घडले आहेत.
त्यामुळे संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व लोकप्रतिनिधींनी याकडे गांभीर्याने लक्ष देऊन पुलाच्या सुरुवातीला असलेल्या खड्ड्यात भराव भरून पुलाच्या सुरूवातीला दुतर्फा संरक्षण कठडे लावण्याची मागणी पालांदूर परिसरातील ग्रामस्थांसह वाहनधारकांकडून करण्यात येत आहे.